अतिवृष्टी बाधित व पूरग्रस्त नागरिक विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करावे- खा.धैर्यशील मोहिते पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


  माढा लोकसभेचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अतिवृष्टी बाधित व पुरग्रस्त नागरिक विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्याची मागणी सोलापूर जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे पत्राद्वारे केली.सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांची घरे पाण्यात जलमय झाली, संपूर्ण प्रपंच वाहून गेला, तसेच महत्त्वाची कागदपत्रे देखील नष्ट झाली आहेत. महापूरग्रस्त नागरिकांना पुनर्वसनाच्या कामाकरिता तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची गरज भासणार आहे. परंतु कागदपत्रांच्या अभावामुळे हे नागरिक सरकारी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनामार्फत विशेष कॅम्पचे आयोजन करून, नागरिकांना हरवलेली अथवा नष्ट झालेली महत्त्वाची कागदपत्रे (उदा. आधार कार्ड, राशन कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी) पुन्हा मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी म्हणून सांगितले आहे.तसेच, या महापुरामुळे अनेक विद्यार्थ्यांची शालेय व महाविद्यालयीन कागदपत्रे नष्ट झालेली आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात अडथळे येऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र कॅम्पचे आयोजन करून त्यांना  आवश्यक कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देण्यात यावीत.यामुळे महापूरग्रस्त नागरिकांना शासकीय योजनांचा योग्य लाभ मिळेल तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यापासून रोखता येईल. अशा प्रकारच्या आशयाचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

You may have missed