डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला प्रवेश दिन म्हणजे 7 नोव्हेंबर विद्यार्थी दीन होय…. वैभव गिते

 7 नोव्हेंबर 2025 हा दिवस म्हणजे भारतीय इतिहासातील शिक्षण क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातील ऐतिहासिक क्रांतिकारी दिवस होय! 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस! महान शिल्पकार – विद्यार्थी दिवस!! आज सात नोव्हेंबर सिम्बॉल ऑफ नॉलेज,शिक्षण तज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा प्रथम शाळा प्रवेश!! म्हणजेच राज्यभर विद्यार्थी दिवस म्हणून ओळखला जातो. विद्यार्थी दिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना तसेच नागरिकांना लाख लाख शुभेच्छा!  पुस्तकावर जिवापाड प्रेम करणारे, पुस्तक म्हणजे जीव की प्राण असणारे, शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा मानणारे, डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला प्रवेश दिन म्हणजे 7 नोव्हेंबर. विद्यार्थ्यांना ‘शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्याच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी यासाठी’ हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 27 ऑक्टोबर 2017 रोजी घेतला. हा निर्णय शासनास शिव,फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी घ्यावयास भाग पाडला.तेव्हापासून सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित करून दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित कराव्यात अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.७ नोव्हेंबर हा ऐतिहासिक दिवस याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रताप सिंग हायस्कूल सातारा येथे प्रथम शाळा प्रवेश झाला. आणि तोच विद्यार्थी दिवस म्हणून पुढे आला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (आता प्रतापसिंह हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. येथे ते इ.स. १९०४ पर्यंत म्हणजेच चौथी पर्यंत शिकले. शाळेत त्यांच्या नावाची भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आहे. शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ क्रमांकासमोर बाल भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे.एक विद्यार्थी बनून जीवनभर शिक्षण क्षेत्रात प्रवास केला. जगाला धर्मनिरपेक्ष, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता समानता ही मूल्ये शिकविली ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुस्तकावर खूप प्रेम केले. अत्यंत गरिबी हालाखीची परिस्थिती. चातुर्वरण्य व्यवस्थेने व अस्पृश्यतेने काहूर माजवलेले दिवस,गरिबीच्या झळांच्या सोबतच पोटाला चिमटे घेऊन जगण्याचा ससेहेलपटपणाअशा या संघर्षातून शिक्षण हा केंद्रबिंदू मानून, शिक्षणाशिवाय तरनोपाय नाही असे जाणून बाबासाहेबांच्या वडिलांनी म्हणजे रामजींनी त्यांना प्रथम शाळेत घातले आणि शिक्षण घेण्याचा संदेश दिला. लहानपणापासूनच अतिशय हुशार व चौकस बुद्धीचा असलेले बाबासाहेब वर्गात पहिल्या क्रमांकाने पास होत.बाबासाहेबांना शाळेचे गोडी निर्माण झाली. वाचनाचे वेड लागले,   वाचनातूनच ते स्वतः घडले. उच्च विद्या विभूषित झाले आणि  समाजाला घडवले व देशाला घडवण्याचे मौल्यवान कार्य केले. जगात सर्वात सुंदर असे संविधान या भारतासअर्पण केले.म्हणून आजचा हा दिवस अत्यंत प्रेरणादायी, शिक्षण प्रेमींसाठी, विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी मोलाचा ठरेल.प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गरीब परिस्थितीला तोंड देत परिस्थितीवर विजय मिळवत यशाचे शिखर गाठले.त्यांचे बुद्धीचातुर्य त्यांचे, ज्ञान कौशल्य व त्यांच्या कार्यातील प्रामाणिकपणा या गुणामुळेच ते भारतरत्न ठरले!! आणि त्यामुळेच त्यांना आदराने विश्वरत्न म्हटले जाते. आज सर्व विद्यार्थ्यांना बाबासाहेबांपासून खूप मोठी प्रेरणा मिळते. जीवन जगण्याची व संघर्षाला तोंड देण्याची, संघर्षातून मार्ग काढत यशाचे शिखर गाठण्याची कला व धाडस प्राप्त होते म्हणून आधुनिक काळातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचे वाचन करणे अत्यंत गरजेचे आहे. आजचा विद्यार्थी हा भविष्यातील देशाचा आधारस्तंभ आहे. आजचा विद्यार्थी उद्या देश घडविणारा आहे. आजचा विद्यार्थी उद्या देशाचे संरक्षण करणारा आहे. आजचा विद्यार्थी हा देशाचे भविष्य आहे.म्हणून तो प्रामाणिक, चरित्रवान कार्य कुशल, कर्तव्यदक्ष देश प्रेमी, समाज हिताचा विचार करणारा घडला पाहिजे,  म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मी प्रथमतः भारतीय व अंतिमतः भारतीय आहे हा दिलेला संदेश बाबासाहेबांचे देशावरील प्रचंड प्रेम दाखवते.लोक राहण्यासाठी घर बांधतात पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी घर बांधलं व हजारो पुस्तके त्या घरामध्ये ठेवली त्याचं नाव राजगृह होय!ज्ञान हे अथांग सागरासारखे आहे त्यामुळे माणसाने शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानार्जन करत रहावे असा संदेश देत मी आजीवन विद्यार्थी आहे असे बोलून शिक्षणाबद्दल व ज्ञानाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूक किती मोठी होती याचा विचार करता येईल.अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही डॉ.आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारावे लागतील.या देशाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच तारू शकतात.हा शाळा प्रवेश दिन प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा व काव्य वाचन स्पर्धा घेऊन साजरा करायचा आहे. याच दिवशी महाराष्ट्र शासनाने वंदे मातरम या गीताचा 150 वा वर्धापन दिनाचे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळा महाविद्यालयात विद्यार्थी दिन योग्य प्रकारे साजरा होतो किंवा कसे ? विद्यार्थी दिवस साजरा करून घेण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराज,फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीतील नेत्यांची व कार्यकर्त्यांची आहे.आजच्या या विद्यार्थी दिनानिमित्त या महामानवाला व त्यांच्या कार्याला कोटी कोटी विनम्र अभिवादन!——————————-——–
मा. वैभव तानाजी गिते राज्य सचिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस निमंत्रित सदस्य: जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती पुणेमो.8484849480

You may have missed