कळंबोली येथील मातंग समाजातील संदिपान खिलारे यांचा ग्रामपंचायत कर्मचारी ते वैद्यकीय पदवी पर्यंतचा खडतर प्रवास
पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क प्रमोद शिंदे
ग्रामपंचायत कळंबोली येथे ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून गेले दहा वर्ष सेवा बजावत असलेले मागासवर्गीय मातंग समाजातील संदिपान शिवाजी खिलारे यांनी ‘निसर्गोपचार तज्ञ’ व ‘योग व पारंपरिक वैद्य’ या दोन वैद्यकीय पदव्या मिळवून एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. संदिपान शिवाजी खिलारे यांनी हे यश केंद्र शासन आयुष मंत्रालयाच्या ‘योग व पारंपरिक वैद्य’ या अभ्यासक्रमाची वैद्यकीय पदवी परीक्षा व सातारा येथील मिटकॉन या शासनमान्य प्राप्त संस्थेतून शरीरशास्त्रातील ‘निसर्गोपचार तज्ञ’ या एक वर्षाच्या कोर्सची परीक्षा सुद्धा ते अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून प्रामाणिकपणे काम करत असताना, कळंबोलीसह परिसरातील गावातील गरीब गरजू रुग्णांना आरोग्यविषयक योग्य सल्ला देणे, रात्री बे रात्री गंभीर रुग्णांना योग्य हॉस्पिटलला दाखल करणे, कॅन्सरग्रस्त रुग्णांना बार्शी व इतर रुग्णांलयात दाखल करून मोफत उपचार कसे होतील ? याचा प्रयत्न करणे यासारख्या रुग्णसेवा ते करत आहेत. रुग्णसेवा करता करता वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवणे ही कामगिरी आजच्या तरुण पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरेल. तसेच जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर शिक्षण घेणे,नवीन स्वप्न पूर्ण करण्यास वय व काळाचे बंधन नसते हे त्यांनी आपल्या प्रयत्नातून दाखवून दिले आहे. त्यांच्या या यशाचे समाजाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

