मुक्तीभूमी, दीक्षाभूमी, चैत्यभूमी प्रेरणादायी मंत्री छगन भुजबळ
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क येवला
दि. १३ मुक्तीभूमी, दी क्षाभूमी, चैत्यभूमी या प्रेरणाभूमी आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला या मुक्ती भूमीतूनच धर्मांतराची घोषणा केली त्यामुळे या भूमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली आणि या घटनेला आज९० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत येवला येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ, बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. या वेळी भुजबळ यांनी मुक्तीभूमी स्मारकाच्या विकासाची माहिती देत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील महत्त्वाच्या तीन भूमी ज्यामध्ये प्रथम मुक्ती भूमी, द्वितीय दीक्षाभूमी आणि तृतीय चैत्यभूमी या पैकी येवला येथील मुक्ती भूमीचा विकास करण्याची संधी प्राप्त झाल्याचे समाधान व्यक्त करत असताना मुक्ती भूमी स्मारकाचे हस्तांतरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे ला केल्याचे प्रतिपादन केले. बार्टी कडे हस्तांतरित झालेल्या स्मारका मध्ये महामानवांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्या करिता या ठिकाणीनवीन पुस्तक स्टॉल आज पासून सुरू करत असल्याचे बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी सांगितले. महामानवास अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांची स्मारक भूमीमध्ये कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून बार्टी तसेच स्थानिक प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आलेली होती. या वर्षी कार्यक्रमाच्या नियोजना करिता बार्टीचे येवला स्मारक, बार्टी मुख्यालय कर्मचारी व सुरक्षा रक्षक तसेच समतादूतांनी विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड व निबंधक इंदिरा अस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने उत्तम नियोजन केले होते. धर्मांतर दिन सोहळा यशस्वी होण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक श्री सुमेध थोरात, प्रकल्प अधिकारी रेखा बोर्डे, सचिन नांदेडकर यांच्यासह बार्टीतील कर्मचारी व समतादूत यांनी परिश्रम घेतले.
