एन.डी.एम.जे च्या वतीने महापरिनिर्वाण दिना दिवशी मुख्यमंत्र्यांना हजारो पोस्टकार्ड द्वारे निवेदन

अनुसुचित जातीजमातीच्या न्याय मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना लिहीली हजारो पोस्टकार्ड
महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोस्टकार्ड अभियान
एनडीएमजे व आदिवासी एम्प्लॉइज संघटनेचा उपक्रम
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वाशिम – महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाणदिनी ६ डिसेंबर रोजी नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने अनुसूचित जाती आणि जमातीच्या न्याय हक्कासाठी पोस्ट कार्ड अभियान राबविण्यात आले. यावेळी अनुसुचित जातीच्या समस्या मार्गी लावण्याच्या मागणीसाठी पाठविण्यात आलेल्या पोस्टकार्डवर विविध मागण्या नमूद करुन हे पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. सदरील मागण्या त्वरीत अंमलात आणण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर निर्णय घेऊन कार्यान्वीत करण्याची मागणी एनडीएमजेचे राज्य सहसचिव पी. एस. खंदारे यांच्यावतीने करण्यात आली.
पोस्टकार्डवर नमूद मागण्यांमध्ये, बौद्ध, अनुसूचित जाती-जमातींच्या हक्काचा प्रगतीचा अर्थसंकल्पित निधी सार्वजनिक आरोग्य विभागास व इतर विभागास वळवला असल्याने त्याची परिपुर्ती करावी, निधीचा गैरवापर टाळण्यासाठी बजेटचा कायदा पारित करावा. अनुसूचित जाती जमाती आयोगावर अध्यक्ष व इतरही सर्व प्रकारच्या सदस्य यांच्या नियुक्त्या कराव्यात, मागासवर्गीयांसाठीचे विविध आर्थिक विकास महामंडळावर अध्यक्ष व इतरही सदस्य यांच्या नियुक्त्या कराव्यात व आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी आदी सोळा प्रकारच्या मागण्या पोस्टकार्डवर नमूद करुन हे हजारो पोस्टकार्ड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या कार्यक्रमाच्या सुरवातीला एनडीएमजेचे विदर्भ विभागीय उपाध्यक्ष राजीव दारोकार व डॉ. रामकृष्ण कालापाड यांच्या हस्ते महामानवास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पी. एस. खंदारे यांनी पोस्ट कार्ड अभियानाची भुमिका उपस्थित मान्यवर मंडळी यांना समजून सांगितली व संविधान प्रास्ताविकाचे सामुहिक वाचन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
दरम्यान महापरीनिर्वाणदिनी एनडीएमजेचे पी. एस. खंदारे, राजीव दारोकार, मधुकर जुमडे, डॉ. रामकृष्ण कालापाड, अॅड. डॉ. मोहन गवई, समाधान सावंत, दतराव वानखेडे, भागवत गवई, नारायण सरकटे, कुसुमताई सोनुने, रामदास वानखेडे, बालाजी गंगावणे, सुखदेव काजळे, अॅड. विजय बनसोड, महादेव कांबळे, बबन खरात, भीमराव खरात, गजानन ढोके, बाबाराव गोदमले, रमेश मोरे, नाजुकराव भोंडणे, आनंदा वायले, नारायण सरकटे, सुभाष साबळे, अरविंद भिसे, अविनाश भिसे, नीलेश भोजणे, प्रा. पाईकराव, खडसे आदीच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंंत्र्यांना पाठविण्यात आले. कार्यक्रमाला साहित्यिक, लेखक, कवी व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते.

